खिन्नता

(त्या उभयतांचे सांत्वन करण्यास शेजारी येतात.)

जमुनिया जन ते समजाविती
रडू नका रडणार तरी किती
जशी असेल तया प्रभुची मती
मिळतसे सकळांस तशी गती।।

रडुनि काय, विवेक मनी धरा
उपजणे मरणे न चुके नरा
अजि स्वदेशहितार्थ मरे सुत
सुकृति तो करि वंश समुन्नत।।

जरि जगी मरणे, मरणे तरी
करुनिया कृति, जी जन उद्धरी
वदति संत असे वच सतत
करुनि तेच कृतार्थ भवत्सुत।।

रडु नका मुळी, ना मळवा मुख
गिळुनि दु:ख मनी धरणे सुख
अमरता मिळवी मिरवी यश
धवळितो सुत आज दिशा दश।।

रडु नका मुळी धीर मनी धरा
अमरता न जगात कुणा नरा
सुत गुणी रुचला परमेश्वरा
धरिल तो हृदयी प्रिय लेकरा।।

करु नका हृदयी मुळी खंत ती
नुरलि की आपणाप्रति संतती
भरतभूमिमधे किति बाळक
तुम्हि बना करुणाघन पाळक।।

रडु नका मुळि अश्रु न ढाळणे
भरत-माय-मुले तुम्हि पाळणे
निजसुतानन तेथच पाहणे
मति धरुन अशी जगि राहणे।।

(लोक जातात. अंधार पडू लागतो. मातापितरे खिन्न बसतात.)

ते माय-बाप पुशिती निज लोचनांते
अश्रूच ते न उरले मुळि मोचनाते
ते बसले वरुनि शांत मनी सचिंत
ना दु:ख पुत्रनिधनासम ह्या महीत।।

राहे कुणी, सकल ते बहुतेक गेले
येतीच अश्रु फिरुनी भरतीच डोळे
आकांत ना परि अता रडणे मुक्याने
ये हुंदका मधुनि ऐकु कुणास काने।।

अंधार आज भरला भरल्या घरात
त्याहून दाट भरला भरल्या मनात
लावी कुणी तरि तदा सदनात दीप
आशा नसे तिळ परी हृदयासमीप।।

ती बैसली उभयतां पुतळेच खिन्न
आधारहीन सुमने जणु वृतहीन
भूमीवरी उभय ती पडली अशांत
डोळा क्षणैकभऱ लागतसे तशात।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा