भलेबुरे सा-यांत आहेत

(बाबा मुसलमानांस आपण सदा नावे ठेवतो परंतु ते सारेच वाईट नसतात. भलेबुरे सा-यांत आहेत.” अशी विचारसरणी मुलगा मांडतो.)

“हिंदु धर्म सामनतेस शिकवी आचार उल्टा परी
इस्लामी जन वागती अधिक ते एकत्र बंधूपरी
अन्या बंधुस आगगाडिमधि तो भेटे मुसलमान जरी
बोलू लागति, एक होति, मिळती, खातील एकत्रही।।

आम्हां संकुचितांतरांस गमते की तो मुसलमान अरी
दृष्टी नाहि विशाल, तीन शतके मागे विहारा करी
देऊ घालवुनी अम्हांस गमते येथून बाहेर त्या
ज्यांच्या येथ अनेक आजवरि त्या झाल्या पिढ्या नांदत्या।।

मातेचे परशत्रु ते विसरतो, आहे मुसलमान तो
ऐसे नित्य कथांतुनी अजुनही काव्यांतुनी दावितो
पोवाडे अजुनी म्हणू गरजती कापा मुसलमान जे
राष्ट्राचे नव प्रश्न खोल बघण्या धी आमुची ना धजे।।

इस्लामी म्हणजे कठोर ठरला दुर्वृत्त पापी ठक
नाही तद्-हृदयास पाप म्हणुनी वस्तू जणू ठाउक
हिंदूंच्या बळजोरिने पळवुनी न्याव्या स्त्रिया सतत
ऐसे नित्य अम्ही जना शिकवितो की हे मुसलमान-व्रत।।

ना हे सत्य मुळी, तयातहि पहा ते नांदती सदगुण
प्रामाणीकपणात नाहि कमती ते तात हिंदुहुन
इस्लामी गवळी न नीर मिसळी, हिंदु कसा तो असे
जो पूर्वग्रह-दूषितांतर नसे त्या सर्व काही दिसे।।

नाना गाव पहा, घरोघर तिथे ते भृत्य प्रामाणिक
इस्लामी दिसतील खेळविति जे प्रेमे मुले बाळक
जे श्रीमंत कुबेर तदभवनिही इस्लामि ते चाकर
निष्ठापूर्वक कामधाम करिती संपादिती भाकर।।

होतो घेत समस्त एकवटुनी अन्योन्य-सत्- संस्कृती
ती रामायणभारतोपनिषदे भाषांतरीली किती
इस्लामी कविंनी, सुकाव्य लिहिले येथील भाषांतुनी
प्रेमे वाढविले कलांस नमुने उत्कृष्ट ते निर्मुनी।।

केली जी रणकंदने विसरुनी हिंदुमुसलमान जनी
माता भारत एक ही सकळिकी वृत्ती मनी आणुनी
जो जो भारतभूमिला पदतळी ठेवील तो तो रिपू
मानोनी, करण्या स्वतंत्र निजभू या तात सारे खपू।।

मोठे संकट दूर आधि करु या बारीक राहो दूरी
मातेच्या हृदयात खोल घुसली ही दास्यरुपी सुरी
होऊ या झणि एक, एक हृदयी तो राष्ट्रधर्म स्मरू
इस्लामी जन तोहि बंधू समजू वृत्ती उदारा करू।।

धर्माचा जरि खोल पाहु तरि तो आत्मा असे एकच
आम्हालाच नको, पहा पडतसे रुढ्यादिकांचा खच
जे तुम्हां दिसतात भेद असती काळ स्थितीच्यामुळे
त्या भेदांसच मुख्य मानुन पहा हे भांडताती खुळे।।

का हा सनातन प्रथित हो, त्याचा कळे अर्थ का
रुढीच्या भजकांस तात मुळि तो नाहीच हो ठावुका
जे सतत्व कुठे दिसेल जगती जे सत्य कोठे दिसे
ते ते घेइ सनातनी जरि खरा, तददृष्टि कोती नसे।।

तत्त्वाची महती असे, न महती व्यक्तीस; सत्याप्रत
सांगो शंकर, बुद्ध, ख्रिस्त, मनु वा पैगंबर प्रेषित
ज्ञानोबा कथु वा कबीर कथु दे एका तुका नानक
जो जो धर्म सनातनी असत तो सतत्त्व-संग्राहक।।

देखा धर्मि सनातनी सगुणही आहे तसे निर्गुण
आहे यज्ञच फक्त देवहि नसे मीमांसकालागुन
बुद्धाला अवतार मानित असो, केला तया आपुला
ही संग्रहकता असे म्हणुन हो हा धर्म आहे भला।।

जैसे ते अवतार मानित असो श्रीरामकृष्णादिक
बुद्धख्रिस्तमहंमहासहि चला मानू जगत्तारक
होते सांगत सर्वदा शिकवित श्रीरामकृष्ण प्रभु
आलिंगील जगा सनातन जरी हा धर्म आहे विभु।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा