भारतातील मुले

(एक अविवाहित तरुण भगिनी स्वत:ला उद्देशून म्हणते)

भारतात या नसे मुलांचा तोटा तो तिळभरी
नाही वाढविणारा परी
विचारहीनापरी वागती मायबाप बापुडे
बघति न काय मुलांचे घडे
बाळे घरात खंडीभर
नाही वस्त्रहि अंगावर
नाही खायाला भाकर
विचारमेवा दूर राहिला, रोगी अति चिरचिरी
बाळे दिसती किति घरोघरी।।

कशास तरि तू विवाह करिशी, आधिच जे बाळक
त्यांची होई तू पाळक
त्यांची होई खरीखुरी तू माता प्रेमाकरा
निर्मी निर्मळ सेवा-झरा
ठायीठायि अभागी मुले
जैशी किड्याने खाल्ली फुले
बघुनी अंतरंग हे उले
जा ते बाळक जलळी घेई प्रेमाने सत्वरी
होई त्यांची जननी खरी।।

भारतमातेच्या बागेतिल सुमने ही विकसवी
सजवी नटवी तू हासवी
खाया देई, ल्याया देई, मनोबुद्धी वाढव
यातच जावो जीवन तव
याहुन धन्य काय अन्य ते
फुलवी फुल जरि कुणि एक ते
प्रभुपद त्याला ते लाभते
हाचि धर्म गे हाचि मोक्ष गे ध्येय अंतरी घरी
या सेवेसी न दुजी सरी।।

(ती पुढील ध्येय निश्चित करते.)

गरीब कोणी कुणबी हमाल। तदीय संवर्धिन गोड बाळ
तयास मी सुंदर वाढवीन। फुलांपरी निर्मळ मी करीन।।
तयास मी घालुन न्हाण नित्य। तयास मी देइन स्वच्छ वस्त्र
तयास साधी शिकवीन गाणी। न घाण देईन पडूहि कानी।।
तयास नेईन सदा फिराया। नदीतटाकी, गिरि वा चढाया
तयासवे खेळ मुदे करीन। तयाविणे कोणि जणू मला न।।
मुलेच माझे बनतील देव। करीन तत्पूजन मी सदैव
मुलांस संवर्धुन भारताच्या। पडेन पायावरती तयाच्या।।
कळ्या मुक्या या प्रिय भारताच्या। विकासवोनी चरणी तयाच्या
समर्पुनी प्रेमभरे, मरेन। सुखे प्रभूच्या चरणी मिळेन।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा