मातेचे गाणे

(गाणे संपताच माता म्हणते)

“सुंदर कितिकरि हे गाणे वेडावुन जावे प्राणे
पहा तरू हे गहिवरले टपटप गळती अश्रुजले
पहा तुटे तो नभि तारा ऐकुन गीता मनोहरा
गुप्त खालती येवोनी गीताचा ऐकत ध्वनी
बाळ, कसे रे हे गाणे वेडा जणु हा कवी मने
वेडा इतरांनाहि करी हृदयि भावनापूर भरी”

(मुलगा म्हणतो)

“चित्रकार कवि हे सारे होतिल एकसरे
भूमातेचे हे भक्त भाग्य तिचे ते वाढवित
भारतभूच्या भाग्याची तहान सर्वांना साची
देशामाजी स्वतंत्रता आणायाला उत्कटता
कवीचित्रकारांनाही दास्य तयांचे मन दाही
देशासाठी तव गेला सुत, न नवल हे, हा झाला
धर्म आइ गे सकळांचा ध्यास समस्त देशाचा”

(इतक्यात एकदम दुसरे गाणे गाणे ऐकू येते.)
कोठुन दुसरा ध्वनी येतो हळुहळु मोठा हा होतो

(आई म्हणते)
“प्रभातफेरी करावया मुले चालली रे सखया
रुचे तयांना ना शय्या निघती जागृति ती द्याया.”

(मुलगा म्हणतो)
“ऐकू आई तरि त्यांचे गीत रोमहर्षक साचे”

(प्रभातफेरीचे गाणे)
उठा बंधुंनो! पहा उगवला भास्कर वेळेवरी
तमोहर भास्कर वेळेवरी
प्रकाश पसरी जिकडे तिकडे
धरणीवरि अंबरी।।

झोपेची का वेळ असे ही उघडा रे लोचन
आपुले उघडा रे लोचन
झापुन बसलो म्हणून आले आले हे दुर्दिन
झापड उडवा डोळे उघडा पहा काय चालले
सभोवती पहा काय चालले
स्वातंत्र्याच्या दिव्य विचारे राष्ट्र सर्व रंगले
गुलामगिरिचा अजुन न आला वीट तुम्हाला कसा
बंधुंनो, वीट तुम्हाला कसा
स्वातंत्र्यास्तव कष्ट कराया कंबर आता कसा
ऐशीही सोन्यासरी। संधी न पुन्हा येईल
जरी उठाल झडकरि सारे। भाग्योदय तरि होईल
प्रगटवा आपुले तेज। स्वातंत्र्य माय मिळवील
उठा, करावी अचाट करणी, झोप नसे ही बरी
बंधुंनो, झोप नसे ही बरी
उठा उठा रे मायभूमि ही मुक्त करा सत्वरी।। उठा...।।

हिंदुमुसलमान एक होउनी स्वातंत्र्यास्तव उठा
उठा रे एक दिलाने उठा
स्वातंत्र्याचा निजसत्तेचा फडकू दे बावटा
ब्राह्मण अब्राह्मण बंधूंनो पुरे करा भांडणे
क्षुद्र ती पुरे करा भांडणे
श्रेष्ठकनिष्ठ न कोणी उठुनी देशास्तव झुंजणे
मायभूमिच्यासाठी जो ना धावे अस्पृश्य तो
समजणे मनात अस्पृश्य तो
बंधुबंधुसे उठा उठा रे भारत बोलावितो
मायभूमिसाठी आता होउनिया भाई भाई
भांडणा तुम्ही विसरावे ही स्वातंत्र्याची घाई
ही स्वतंत्र भूमी करणे आपुली भरतभूमाई
गुलाम म्हणुनी जगणे आता आपण धरणीवरी
अत:पर आपण धरणीवरी
स्वतंत्र भारत करावयाते उठा उठा सत्वरी।। उठा बंधुंनो....।।

(मुलगा म्हणतो)
“आई पाहि हे दृश्य सर्व या भारतावरी
सर्वत्र जागृती झाली तम ना जनतांतरी।।

मुले बाळे पहा एक विचारे भारली जशी
हसेल दिव्य तेजाने भारताननसच्छशी।।

भारताचे दिव्य भाग्य मदीय नयना दिसे
आनेद शांति ती नांदे वाव ना कलहा असे।।"



(गाणे)
प्रियकर भारत, गुणमणि भारत, स्वातंत्र्या पावो
सकल विकलता
विलया जाउन
निजतेजा लाहो।। प्रियकर....।।

संहारुन संसार-विषमता
निर्मुन धरणीवरती समता
शातिपथा दावो।। प्रियकर....।।

मोहमलिनता दुरभिमानता
असुर-समरता सत्ता-रसता
जगतातुन जावो।। प्रियकर....।।

मनुज-दिव्यता विश्वबंधुता
उदया येवो मरुनी पशुता
वरति जगा नेवि।। प्रियकर....।।

धर्म सकल होवोत उदार
हंसासम जन निवडो सार
स्नेह विपुल होवो।। प्रियकर....।।

करुनि निजांतर-तिमिर-निरास
करुन घेउ दे जगा विकास
प्रतिबंध न राहो।। प्रियकर....।।

उत्साहाचा आनंदाचा
सहृदयतेचा जगदैक्याचा
पवन मधुर वाहो।। प्रियकर....।।

ज्ञानहि वाढो आदर वाढो
श्रद्धा वाढो सदगुण वाढो
परमात्मा येवो।। प्रियकर....।।

उत्तरोत्तर प्रकाश लाभुनी
पूर्णतेकडे डोळे लावुनी
प्रभुस मनुज पाहो।। प्रियकर....।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा