पुत्राचे शेवटचे निवेदन

(आईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू जमलेले पाहून मुलगा शेवटचे सांगतो)
किति मी समजाविले तुला
न रडे देइ निरोप तू मुला
नच मोहदरीत तू पडे
परि कर्तव्यगिरीवरी चढे।।

धरि धीर मनात गाढसा
न रडावे जननी ढसाढसा
जगता सुखवी सदा सये
किति मी सांगु बरे तुला बये।।

रडणे प्रभुजीस नावडे
रडणे द्रोह तदीय तो घडे
हसुनी मज दे निरोप तो
मरणाने तव पुत्र शोभतो।।

मृति ही सदलंकृती मला
मृति देते मज किर्ति निर्मळा
सुत धन्य खराच जाहला
जननी तू करि थोर सोहळा।।

करुनी निज नेत्र कोरडे
निज कर्तव्य करावया पुढे
झणि सिद्ध विशंक आइ हो
मति मोदे तव दु:ख हे सहो।।”

(मातेचे म्हणणे)

“ठेवून हृदयी तूते स्मरुन त्वद्वचा सदा
हृदयी भगवंताच्या धरुनी पावना पदा।।

प्रेमस्नेहामृताचा मी सुकाळ धरणीवरी
करीन बाळका नित्य वाक्य हे हृदय धरी।।

येईल लोचनी पाणी त्वत्स्मृती मज येउन
कर्तव्य करण्यासाठी पुसून परि टाकिन।।

दोन ही पिकली पाने श्रमुनी गळती यदा
भोटाया तुजला येऊ बघाया प्रर्भुच्या पदा।।”

(मुलगा म्हणतो)

“मोहतिमिर नाशाया आला देवाचा हा बाळ
आई बाबा निरोप द्यावा देव करिल सांभाळ
येतो बाळ अता
सुखवा भारतमाता। येतो बाळ अता।।

(मुलगा आता कायमचा जाणार हा विचार मनात येऊन मातेला फार दु:ख होते. ती मुलाला सदगदित होऊन म्हणते-)

आपार पान्हा हृदयात हाटे
आपार पाणी नयनांत लोटे
पुसूनिया ती परि लोचनांस
अतीव कष्टे वदते मुलास।।

“उभा राहा नीट जरा समोर
गड्या तुला पाहिन एकवार
असे तुझे दर्शन शेवटील
पुन्हा न ते ह्या भुवनी मिळेल”।।

समोर येऊन सुपुत्र राही
तयास माता अनिमेष पाही
बघू न देती भरतीच डोळे
पुशी, पुन्हा ते बनतीच ओले।।

न बोलवे तृप्ति म ती बघून
भरेच पाणी नयनी फिरुन
पुन:पुन्हा लोचन ते पुसून
तयास ठेवी मनि साठवून।।

पिते जणू बाळकरुप आई
पिताहि साश्रु स्वसुतास पाही
उचंबळे वत्सलता अनंत
न वर्णनाला कवि हा समर्थ।।

पुन: पुन्हा बाळक-मूर्ति पाही
न तृप्ति ती मातृमनास होई
‘मदीय माते! मम वेळ आली’।।
वदून ती मूर्ति अदृश्य झाली।।

टवटवीत ती तरुची पाने। विहंग गाती मंजुळ गाणे
सृष्टी सांगते दु:ख गिळावे। कर्तव्यास्तव पुन्हा उठावे।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा