माझे विद्यापीठ

(कविवर्य नारायण सुर्वे यांची ' माझे विद्यापीठ ' ही कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या या शब्दाशब्दातून ती वेदना सारखी ठसठसत राहते, कामगार नावाची गोष्ट सांगत राहते.)


ना घर होते , ना गणगोत , चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते , मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.

अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता....
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.

मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे , वाचली पाट्यांवरची बाराखडी
व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत ; हातचे राखून कित्येक मारलेले गडी.

हे जातीजातींत बाटलेले वाडे , वस्त्या , दारावरचे तांबडे नंबरी दिवे
सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे.

अशा तांबलेल्या , भाकरीसाठी करपलेल्या , उदास वांदेवाडीच्या वस्तीत
टांगे येत होते , घोडे लोळण घेत होते , उभा होतो नालीचा खोका सांभाळीत.

" ले , पकड रस्सी-हां-खेच , डरता है ? क्या बम्मनका बेटा है रे तू साले
मजदूर है अपन ; पकड घोडे को ; हां ; यह , वाह रे मेरे छोटे नालवाले. "

याकुब नालबंदवाला हसे , गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई
" अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा. " म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई.

याकुब मेला दंग्यात , नव्हते नाते ; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही
उचलले नाही प्रेत तेव्हा ' मिलाद-कलमा '; च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही.

त्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले , " हे नारायणा "
अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट ; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. "

भेटला हरेक रंगात माणूस , पिता , मित्र , कधी नागवणारा होईन
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून.

तरी का कोण जाणे ! माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने ; वाटते , अजून काही पाहिलेच नाही ,

नाही सापडला खरा माणूस ; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ?
सदंतीस जिने चढून उतरताना , मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ?

आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस , गुटगुटीत , बाळसेदार.
आतः खाटकाने हारीने मांडावीत सोललेली धडे , असे ओळीवर टांगलेले उच्चार

जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात
पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत

हे सगळे पाहून आजही वाटते , " हे नारायणा , आपण कसे हेलकावतच राहिलो. '
चुकचुकतो कधी जीव ; वाटते , ह्या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो.

थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता , का आवरला म्यानावरचा हात ,
का नाही घेतले झोकवून स्वतःला , जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात.

विचार करतो गतगोष्टींचा , काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक
उध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.

किती वाचलेत चेहरे , किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव , बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.

खूप सोयरीक करोत आता ग्रंथाची ; वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे परिचारिकेसम , कामगारासम निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले.

जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते ; भरताना तेही बापडे दडतील
स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

वाढले म्हणतात पृथ्वीचे वय , संस्कृतीचेही ; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची
छान झाले ; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची.

ह्या कथाः कढ आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात
रात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करुन सोडतात.

कळले नाहीः तेव्हा याकुब का मेला ? का मणामणाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला ?
का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्या गिधाडाने अल्लद उचलला ?

चंद्रा नायकीण ; शेजारीण , केसांत कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी
पंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुन झुलणारी

अनपड. रोजच विकत घेऊ पेपर , रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई
" खडे आसा रे माझो झील ; ह्या मेरेर का त्या रे ," भक्तिभावाने विचारीत जाई.

कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने , ; जगाचा भूगोल होता जवळ
भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन , बराकीवरुन , मलाच कुशीत ओढी जवळ.

मेली ती ; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन
बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन , जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून.

निळ्या छताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी
दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरुन पाठी

वरुन शिव्यांचा कचकोल उडे , " सिव्वर , इंडियन , काले कुत्ते. "
हसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते

आफ्रिकी चाचा चिडे , थुंके , म्हणे ; " काम नही करेगा. "
चिलमीवर काडी पटवीत मी विचारी , " चाचा , पेट कैसा भरेगा ?"

धुसफुसे तो , पोट-या ताठ होत , भराभरा भरी रेलच्या वाघिणी
एक दिवस काय झाले ; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी

टरकावले घामेजले खमीस , त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्य बोलला ,

" हमारा खून झिंदाबाद ! " वाटले , चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट
खळालल्या नसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल

अडकवून साखळदंडात सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला
" बेटा! " गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटून पडला.

कुठे असेल माझा गुरु , कोणत्या खंदकात , का ? बंडवाला बंदीशाळेत
अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात

आता आलोच आहे जगात , वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे ; आपलेसे करायलाच हवे ; कधी दोन घेत ; कधी दोन देत



कविवर्य :- नारायण सुर्वे

1 टिप्पणी: