किती दूरपर्यंत होता तो माझ्याबरोबर, आणि एके दिवशी 

मागे वळून बघतो तर तो आता सोबत नव्हता!

 खिसाच फाटका असेल तर काही नाणी हरवूनही जातात!


 

 तसे आम्ही कुठे वळलो नाही, कधी आमचा रस्ताही वळला नाही

 एक झाले मात्र, कुठे उतार लागला, कुठे होता चढ,

 मी खाली खालीच जात राहिलो, तू जाऊन बसलीस उंचावर!

 अशा बेलगाम उसळत आहेत हृदयातल्या आकांक्षा

 जसे ‘मेक्सिकन’ चित्रपटात घोडे बेफाम दौडणारे!

 या साऱ्या आकांक्षा तबेल्यात करताच येत नाहीत ठाणबंद!

 इतक्या सावधगिरीने चंद्र उगवला आहे आभाळात

 जशी रात्रीच्या काळोखात खिडकीशी येतेस तू

 काय! चंद्र आणि जमीन यांच्यातही आहे काही आकर्षण?

 आयुष्याच्या खेळात रस्सीखेच चालली आहे एकाच बाजूने

 रस्सीचे दुसरे टोक माझ्या हाती दिले असते तर गोष्ट वेगळी!

 प्रतिस्पर्धी तगडा तर आहेच, शिवाय तो समोरही येत नाही! 

 लोकांची तर मेळ्यामध्ये सुद्धा चुकामूक होते 

पण भेटतातच ना कहाणीच्या एका सुंदर वळणावर?

 तसे कायमचे थोडेच कुणी दुरावते परस्परांना?

 रात्री थकल्या भागल्या रस्त्यावर एक सावली

 हलत डुलत आली, खांबावर धडकली, गतप्राण झाली

 खचित, काळोखाचीच कुणी बेवारस अवलाद असणार ती!