राघववेळ

 नभाला धरबंद नाहीं
तळहातावरील वळीव स्पर्शाचा.
उशालगतच्या गंधगार रात्रींत
गुरफटलेले क्षितिज दूर ढकललेंस
आणि बुडून गेलास...
विमुक्त, तरल, उदविलेल्या, श्यामल
टेकड्यांच्या ढगाळांत.
उरलेल्या स्पर्शाच्या ओळींत सजतांना
थिटीं पडलींत माझ्या प्रारब्धांतील अक्षरें !
अनाहूत अशा विलक्षण विश्वासानें,
तडकलींत माझीं घरकुलें,
शेंदरी देठांचे प्राजक्ती स्मशान
ओंजळींतून गळतांना !
तुझ्याच आघातानें कां टळून जात नाहीं
सुरंगी गात्रांना कुरतडणाऱ्या
राघववेळेचा प्रहर ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा