या व्याकुळ संध्यासमयीं
शब्दांचा जीव वितळतो
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें....
मी अपुले हात उजळतों.
तूं आठवणींतून माझ्या
कधिं रंगित वाट पसरशी
अंधार - व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं....
पदराला बांधुन स्वप्ने
एकट संध्यासमयीं
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेईं...
तूं मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या कांठीं
वळिवाचा पाऊस यावा.....